शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली?   

राजकीय नेत्तृत्वाने कच खाल्ली! 

मुंबई : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कोणाच्या दबावाखाली करण्यात आली? डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा काय संंबध? भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती; पण राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. 
 
राऊत म्हणाले, भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. १४० कोटी लोकसंख्येचे महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो, कोणत्या आधारावर? कोणत्या अटी-शर्तीमुळे? भारताला काय मिळाले? ट्रम्प हे कोणत्या अधिकारात मध्यस्थी करत आहेत? युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली होती की, पापाने वॉर रुकवा दिया. मग आता अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
 
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा करणार्‍या भारताची बेअब्रू झाली आहे. जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वक्तव्य आले की, आम्ही युद्ध जिंकले. भारतासारख्या देशाला हे शोभत नाही. कुठे गेले सगळे अंधभक्त? कोणत्या अटी-शर्तीवर तुम्ही ही युद्धबंदी केली? यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला पाहिजे. त्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

Related Articles